वैचारिक लोकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेत प्रत्येक सभागृहात जायला हवं..
चांगली माणसं बाजूला गेली तर लोकशाही धोक्यात येईल-सेवकराम जाधव..
परळी वैजनाथ प्रतिनिधी
राजकारण पैसेवाल्यांचं.. राजकारण गुंडापुंडांचं असं म्हणून दूर न राहता, वैचारिक लोकांनी प्रत्येक सभागृहात जाणे आवश्यक आहे. चांगल्या विचाराच्या नागरिकांनी राजकारणा पासून दूर न जाता सक्रिय सहभाग नोंदवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.
सद्यपरिस्थितीमधे राजकीय पटलावर पैसेवाले व गुंडप्रवृत्तीचे लोक जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याकारणाने वैचारिक विचारधारा असणारी माणसं राजकारणापासून साहजिकच दूर जात आहेत. आपलं हे क्षेत्र नाही असं म्हणत सक्रिय सहभाग घेण्यास धजावत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत असंच होत गेलं, चांगली माणसं पूर्णपणे बाजूला फेकली गेली तर येणाऱ्या काळात खूप मोठे धोके निर्माण होतील.
समाजहिताचे भान असलेली वैचारिक माणसं अनेक क्षेत्रात आहेत. सभागृहात प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासकांची आवश्यकता आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा ठिकाणी समाजसेवक, पत्रकार, साहित्यिक,विचारवंत, शिक्षक, व्यापारी, शेतकरी यासह विविध घटकांचे तत्वशील प्रतिनिधी सभागृहात असायला हवेत. त्याशिवाय लोकहिताची कामं होणार नाहीत.
म्हणून वैचारिक लोकांनी राजकारणा पासून दूर न जाता सक्रिय सहभाग घेत प्रत्येक सभागृहात जाणं आवश्यक आहे. चांगली माणसं बाजूला गेली तर लोकशाही धोक्यात येईल. असे मत सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.


Post a Comment