बलात्कार प्रकरणांची जलद सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी – गणेश वाळके..
परळी वैजनाथ प्रतिनिधी
देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके यांनी बलात्कार प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळावा यासाठी विशेष न्यायव्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.
गणेश वाळके म्हणाले, “बलात्कार हा अत्यंत अमानुष आणि घृणास्पद गुन्हा असून अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. पीडितांना न्याय मिळण्यात होणारा विलंब हा अन्यायासमान आहे. त्यामुळे अशा प्रकरणांना न्यायालयात प्राधान्य देऊन जलदगतीने सुनावणी होणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सरकारने विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवून बलात्कार प्रकरणांवरील सुनावणी अधिक प्रभावी आणि वेगवान करावी. दोषी सिद्ध झालेल्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल.”
याशिवाय, पोलिस यंत्रणेने तपास प्रक्रिया जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी. तसेच पीडितांना मानसिक आधार, वैद्यकीय मदत आणि कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी कायदे, कठोर अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज असल्याचे मत समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.




Post a Comment